बार्शी – शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला; रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता आपण मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा, असे प्रतिपादन कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी १ मे कामगार दिनाच्या सभेला सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना केले.
आयटक कामगार केंद्राच्यावतीने पुतळा पार्क येथून महापुरुषांना अभिवादन करत शहराच्या रस्त्यावरुन घोषणा देत भव्य कामगार मिरवणूक कढण्यात आली होती. त्यानंतर मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मंचावर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे कॉ. लहू आगलावे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कामगार संघटनेचे सुरज अन्नदाते, बांधकाम कामगार संघटनेचे अनिरुद्ध नखाते, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कर्मचारी संघटनेचे प्रवीण मस्तुद , बार्शी नगरपालीका कंत्राटी कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सभेची सुरुवात लाल बावटा फडकवून करण्यात आली.
कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे पुढे म्हणाले “संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम हा कामगार शेतकरी यांनीच केला आहे. धर्मांधभांडवली सत्ता एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेवर बसून कामगार वर्गावर चौफेर हल्ला करीत आहेत. कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात कडवट कायदे करून त्यांना उध्वस्त करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. सातत्यपूर्ण संघर्ष , विचार, अभ्यास, चिकाटी व एकदिलाने आपण पुढे गेल्यास तो कष्टकरी वर्गाचा लाल दिवस दूर नसेल. उद्याची सकाळ ही आपल्याच रक्ता-घामातून उगवेल हा विश्वास मात्र ढळू देऊ नका.”
यावेळी युवराज घाडगे, केदार फुले, बाळासाहेब बाकले, भारत भोसले, भारती मस्तुद , आकाश लोंढे,सचिन काळे, मयूर ननवरे, अनिरुद्ध ओव्हाळ, दया भोसले,सागर बिडवे, अमर जवंजाळ,प्रीतम शेटे, मनोज कुलकर्णी, बाळासाहेब प्रतापे,सागर राजमाने, अब्बास बागवान, तानाजी बागल, उदावंद, नवनाथ पवार, संपत खताळ, रामेश्वर करळे, शहापरी शेख, सत्यभामा जाधवर, निर्मला सरवदे, आनंद गुरव, भारत पवार, भरत चव्हाण, नानासाहेब ठाकरे, अण्णासाहेब ठाकरे ,दादा काकडे, राजू ठोंबरे ,परमेश्वर नागटिळक ,केशव गायकवाड , कसबे सदावर्ते आदी उपस्थित होते.

























