वैराग – बार्शी-वैराग-सोलापूर या मुख्य राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव सध्या अक्षरशः मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था इतकी भयानक आणि बिकट झाली आहे की, दिवसाला किमान चार ते पाच बसेस या रस्त्यावर कुठे ना कुठेतरी बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत. निकृष्ट आणि तोडक्या-मोडक्या अवस्थेतील या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जात असल्याने, एसटीचा हा प्रवास आता पूर्णपणे ‘रामभरोसे’ झाला असल्याचे चित्र आहे.
उन्हाच्या तडाक्यात प्रवाशांचे हाल; कुठेही अन् कधीही बंद पडतात बसेस!
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणावर आहे. अशा कडक उन्हात भर रस्त्यात बस कधी आणि कुठे बंद पडेल, याचा काहीच नेम राहिलेला नाही. दिवसातून तिसरी-चौथी बस रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभी असलेली प्रवाशांना रोजच पाहायला मिळत आहे. बस अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळत राहावे लागते. त्यानंतर येणारी दुसरी बस आधीच हाऊसफुल्ल असल्याने त्यात वृद्ध, महिला, गरोदर माता, लहान मुले आणि ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उभे राहून किंवा लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. एखाद्याला रुग्णालयात उपचारासाठी जायचे असल्यास किंवा काही तातडीचे काम असल्यास, बस बंद पडल्यामुळे त्यांची कामे खोळंबत आहेत आणि प्रवाशांना विनाकारण मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
योजनांपेक्षा बसेसची दुरुस्ती अन् टापटीपपणा महत्त्वाचा!
एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्धे तिकीट (हाफ तिकीट) सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, प्रवाशांचे म्हणणे आहे की, सध्या अशा फुकट किंवा सवलतीच्या योजना देण्यापेक्षा बसेस चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे.
बसेस स्वच्छ असणे,
खिडक्या आणि सीट व्यवस्थित असणे,
बसेस तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.
सध्याच्या बसेसची दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ प्रशासन आणि राज्याचे परिवहन मंत्री नेमकं काय करत आहेत? डोळे झाकून ते या परिस्थितीकडे का पाहत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या खिळखिळ्या बसेसमुळे यापूर्वीही काही अपघात व दुर्घटना घडल्या आहेत, तरीही प्रशासन जागे का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
नागरिकांमधून आणि प्रवाशांमधून चांगल्या बसेसची जोरदार मागणी
शहराच्या ठिकाणी कामासाठी, उपचारासाठी किंवा बाजारहाटासाठी जाणाऱ्या हजारो नागरिकांची ही हक्काची जीवनवाहिनी आता डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने आणि संबंधित परिवहन मंत्र्यांनी या गंभीर समस्येची तात्काळ दखल घ्यावी. बार्शी-वैराग-सोलापूर मार्गावरील या भंगार आणि बाद झालेल्या बसेस तात्काळ बदलून त्याऐवजी सुव्यवस्थित, टापटिप आणि चांगल्या बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी आता बार्शी आणि वैराग परिसरातील नागरिक व प्रवाशांमधून केली जात आहे.
Post Views: 16