टेंभुर्णी – भीमा खोऱ्यासह पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. महिनाभर दडी मारलेल्या वरुणराजाने १ जुलैपासून दमदार पुनरागमन केल्याने धरण साखळीतील बहुतांश धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे वरच्या धरणांतून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असून दौंड येथील विसर्गातही चढ-उतार पाहायला मिळत आहे.
बुधवार, 8 जुलै 2026 रोजी , सायंकाळी 6 वा . पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा 72.39 टीएमसी इतका झाला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 8.74 टीएमसी असून धरण 16.31 टक्के भरले आहे. भीमा नदीपात्रातून येणाऱ्या वाढत्या पाण्यामुळे धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, दौंड येथे भीमा नदीतील विसर्ग 92.892 क्युसेक इतका पुणे जिल्ह्यातून येत आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार हा विसर्ग कमी-जास्त होत असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच धरण साखळीतील पाण्याची आवक आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन विसर्गात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत.
सध्या भीमा खोऱ्यात पावसाची संततधार कायम असल्याने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात येत्या काही दिवसांत आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आगामी खरीप हंगामासाठी ही पावसाची साथ दिलासादायक ठरत आहे. उजनी जलशहर पाण्याची वाढ होत असल्याने माढा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील यांनी भीमा सीना बोगदा व सीना माढा उपसासिंचन याद्वारे पाणी सोडण्याची मागणी पालक मंत्री गोरे यांच्याकडे केली आहे जरी पुणे जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असला तरी अद्यापही सोलापूर जिल्ह्ययाबरोबर माढा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीसाठी व जनावरांसाठी पाणी सोडवण्यासाठी अभिजीत पाटील यांनी पालकमंत्र्याकडे मागणी केली आहे
Post Views: 6