वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील शिक्षक कॉलनी परिसरातील श्री 1008 अजितनाथ दिगंबर जैन मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून देवाच्या मूर्तींसह पंचधातूचे छत्र असा सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वेळापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महावीर भारत दोशी (वय 45, रा. माळशिरस रोड, पालखी चौक, वेळापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, 26 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2.36 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी मंदिरातून चांदीचे कोटिंग असलेली, पद्मासनात बसलेल्या अवस्थेतील सुमारे 11 इंच उंच आणि अंदाजे 11 ते 14 किलो वजनाची अजितनाथ भगवंतांची मूर्ती, पंचधातूपासून बनविलेली सुमारे 8 इंच उंच व अंदाजे 800 ग्रॅम ते 1 किलो वजनाची अनंतनाथ भगवंतांची मूर्ती, तसेच देवाच्या मूर्तीवर लटकविण्यात येणारे पंचधातूचे तीन छत्र असा एकूण सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मंदिरातील धार्मिक वस्तू चोरीला गेल्याने जैन समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी ही चोरी नेमकी कशी केली आणि चोरीमागे कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कुंभार करीत आहेत.






















