सोलापूर – मध्य रेल्वेने कुर्डुवाडी – बोरीबल या अप आणि डाऊन मार्गावरील 104.7 रूट किलोमीटर लांबीच्या विभागात कवच 4.0 प्रणालीची पूर्ण कार्यक्षमतेसह लोको चाचणी 25 ऑगस्ट 2026 रोजी यशस्वीपणे पूर्ण केली. मध्य रेल्वेतील कवच 4.0 प्रणालीची ही पहिली लोको चाचणी असून, रेल्वे सुरक्षेला आणि कार्यक्षमतेला यामुळे मोठी चालना मिळाली आहे.
कवच ही भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आलेली Automatic Train Protection प्रणाली आहे. रेल्वे सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ही प्रणाली Signal Passing At Danger, समोरासमोर होणारी धडक तसेच मागून होणारी धडक रोखण्यासाठी प्रभावी संरक्षण प्रदान करते. तसेच, ब्लॉक सेक्शनमध्ये रेल्वेगाडी असामान्यरीत्या थांबल्यास लोकोमोटिव्हमधून स्वयंचलित SOS अलर्ट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार लोको पायलटद्वारे Loco DMI मधून तसेच स्टेशन मास्टरद्वारे SMOCIP च्या माध्यमातून मॅन्युअल SOS देखील जारी करता येतो.
या प्रकल्पांतर्गत कुर्डुवाडी–बोरीबेल विभागात मंजूर आराखड्यानुसार एकूण 1,430 RFID टॅग्स बसवून त्यांचे प्रोग्रामिंग करण्यात आले. ही कामगिरी सोलापूर विभागाची आधुनिकीकरण, तांत्रिक नवोन्मेष आणि रेल्वे सुरक्षेबाबतची दृढ बांधिलकी अधोरेखित करते. तसेच, ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि स्वावलंबी रेल्वे नेटवर्क उभारण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाला सोलापूर विभागाच्या या यशामुळे बळ मिळाले आहे.





















