जालना : रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या संगम माहुली (ता. सातारा) येथील समाधीस्थळी जागतिक दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, त्यासाठी तातडीने आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी दिले आहेत. या स्मारकासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डॉ संजय लाखेपाटील,सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, करण गायकर, रघुनाथ चित्रे, राहुल डिघोळे, शरद देशमुख तसेच प्राचार्य मोरे आदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी ताराराणी यांच्या समाधीची सद्यस्थिती व ऐतिहासिक वारशाच्या जतनासंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती डॉ संजय लाखेपाटील यांनी दिली असून तज्ज्ञ इतिहासकार व वास्तुविशारदांची समिती स्थापन करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा, असेही सांगण्यात आले.
सदर प्रस्तावानुसार संगम माहुली येथील परिसराचा विकास रणरागिणी छत्रपती ताराराणी व मराठेशाहीच्या शौर्यगाथेचे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून करण्याचा मानस आहे. तसेच ताराराणी यांच्या कार्याचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अभ्यासकेंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. याशिवाय शालेय व उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कार्याचा समावेश करणे, मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना त्यांचे नाव देणे, तसेच त्यांच्या सन्मानार्थ पुतळा उभारणे अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
स्मारक उभारणीसाठी सुमारे १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अनुभवी वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र कोंडले यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच या सर्व विषयांवर पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे लवकरच संगम माहुली येथे भेट देऊन समाधीस्थळाची पाहणी करणार असल्याची माहितीही डॉ संजय लाखेपाटील यांनी दिली आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास गती देण्यासाठीही संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या निर्णयामुळे इतिहासप्रेमी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या कार्याला योग्य तो मान मिळण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

















