बार्शी – तालुक्यात खरीप हंगामात कृषी क्षेत्रात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बार्शी तालुक्यात सोयाबीन पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला असून, हा संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सर्व पिकाखालील एकूण क्षेत्र सुमारे १ लाख ५ हजार हेक्टर असून, त्यापैकी तब्बल ९० टक्के म्हणजे जवळपास ९१ हजार २२८ हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. याशिवाय तूर, उडीद आणि मूग या पिकांचेही मोठे क्षेत्र तालुक्यात आहे. सध्या तालुक्यात सोयाबीनचे सरासरी उत्पादन प्रति एकरी ७ ते ८ क्विंटल इतके मिळत असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे उत्पादन वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न कृषी विभागाने केला आहे.
विशेषतः रुंद सरी- वरंबा पद्धत (बीबीएफ) आणि टोकन पद्धतीने लागवड या तंत्रज्ञानांचा प्रभावी प्रचार व प्रसार करण्यात आला. पारंपरिक पेरणीच्या तुलनेत या पद्धतींमुळे प्रति एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन वाढ निश्चित होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.
टोकन पद्धतीमध्ये मजुरांची अडचण भासत असली तरी त्यावर उपाय म्हणून कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर टोकन यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले. या यंत्राच्या सहाय्याने एक मजूर एका दिवसात किमान दोन एकर क्षेत्रावर लागवड करु शकतो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी प्रेरित करत कृषी विभागाने जवळपास १३ हजार हेक्टर क्षेत्रावर बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यास यश मिळवले. या प्रभावी कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्या नियोजनबद्ध व शेतकरी हिताच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान करताना बार्शी तालुक्यात कृषी विभागाने राबविलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. आधुनिक शेती तंत्रज्ञान गावागावांत पोहोचवून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संतोष कोयले यांचे कार्य इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बार्शी तालुक्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या कार्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी खरीप हंगामात अधिकाधिक शेतकरी बीबीएफ व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याकडे वळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

























