सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असताना संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष मीनल दास यांच्या नेतृत्वाखाली आसरा चौकामध्ये मुख्यमंत्र्याना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लाडक्या बहिणीला पैसे नको दररोज पाणी द्या या मागणीसाठी घागरी घेऊन आसरा चौकात निदर्शने करण्यात येणार होते, तत्पूर्वी midc पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी काही कामानिमित्ताने अक्कलकोट येथे गेलेल्या जिल्हाध्यक्ष मिनल दास, सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, शकुंतला माकाई, जयश्री रानसरजे यांना अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे जाऊन ताब्यात घेतले. विजापूर नगर पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांना सकाळीच ताब्यात घेण्यात आले होते.
सोलापूर शहराला गेल्या अनेक वर्षापासून सात आठ दिवसाआड पाणी मिळते आणि तेही रात्री उशिराने पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे एक तर सोलापूरतील श्रमजीवी कष्टकरी मध्यमवर्गीय नागरिक काम धंदा करून थकून येतात आणि त्यात रात्री अकरा बारा वाजता पाणी सोडले जाते त्या जागरणामुळे अनेक महिला आजारी पडत आहेत.
महाराष्ट्र शासन लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये देते ते आरोग्यासाठी दवाखान्यातच खर्च होत आहेत त्यामुळे देवा भाऊ आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नको दररोज पाणी द्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आसरा चौकात निदर्शने करण्यात येणार होते. पण एमआयडीसी पोलिसांनी अक्कलकोट येथे लोकेशन ट्रेस करत त्यांना अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे नजरकैद करून ठेवले.



























