सोलापूर : राज्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मी रविवारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान,काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून गरज भासल्यास शिस्तपालन समिती स्थापन केली जाईल. डीपीडीसी निधीच्या मुद्द्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात स्पष्ट केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जगभरात उत्साहात साजरी होत असताना सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महामानव बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक गणेश वानकर, किसन जाधव , माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, रॉकी बंगाळे आदी उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण विभागाच्या माहिती पुस्तकेचे लोकार्पण करण्यात आले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात येऊन त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्याचा वेगळाच आनंद असल्याची भावना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. रविवारी होणाऱ्या सांगता मिरवणुकीला आपण उपस्थित राहणार आहे, कारण राज्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक सोलापुरात निघते, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे देशाच्या लोकशाहीचा पाया असून, त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना आहे. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.सोलापूर हे चळवळीचे केंद्र असून येथे येऊन जयकुमार गोरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त केली.
खरात प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असून कोणत्याही तक्रारीअभावी त्याला भोंदू ठरवले गेलेले नाही, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकाळात महिला विधेयकाला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारने महिला विधेयक संसदेत आणले. आधुनिक काळातील महिला आणि मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन करत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, लोकशाही जिवंत असल्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात, असे गोरे म्हणाले. तसेच आम्ही सत्तेत आलो की लोकशाही धोक्यात येते आणि ते सत्तेत राहिले की लोकशाही जिवंत राहते, असे म्हणणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचाही त्यांनी आरोप केला.
ड्रग रॅकेट प्रकरणात संबंधित प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात बोलताना, नगरसेवकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असून गरज भासल्यास शिस्तपालन समिती स्थापन केली जाईल, असे त्यांनी सांगितले. डीपीडीसी निधीच्या मुद्द्यावर खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.






















