पुणे : “विज्ञान निर्मिती करते, तर अध्यात्म जीवनाला आकार देते. ही परिभाषा अत्यंत महत्त्वाची असल्याने विज्ञान-ज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून दिले जाणारे शिक्षणच सर्वश्रेष्ठ आहे. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हे स्वामी विवेकानंदांचे वचन प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात उतरवावे,” असे विचार अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव व स्व. दादासाहेब काळमेघ स्मृति प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ यांनी व्यक्त केले.

विश्वशांती केंद्र, आळंदी आणि माईर्स एमआयटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यात्म-ज्ञान-विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिष्यवृत्ती २०२६’ मधील सुवर्णपदक विजेत्या व सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत काळमेघ बोलत होते.
हा कार्यक्रम विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला.
या प्रसंगी प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. भाऊसाहेब कारेकर आणि पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारतीचे विशेष अधिकारी प्रा. अजयकुमार लोळगे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे होत्या.
तसेच, एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ‘वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास’ प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. एस. एन. पठाण उपस्थित होते.
हेमंत काळमेघ म्हणाले: “वर्तमान काळात देशाला मूल्याधिष्ठित शिक्षणाची नितांत गरज आहे. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणे ही काळाची गरज आहे.”
प्रा. स्वाती कराड चाटे म्हणाल्या: “विश्वास, ध्येय आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो. त्याला आपली आंतरिक शक्ती कळली तर तो स्वबळावर प्रत्येक गोष्ट शक्य करतो. शिक्षण हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. सध्याच्या काळात महिला सक्षमीकरणाची अधिक गरज आहे. भारतीय ज्ञान, परंपरा आणि तत्त्वज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.”
प्रा. अजयकुमार लोळगे म्हणाले: “श्रुती, स्मृती आणि कृती ही विद्यार्थी जीवनातील सर्वात महत्त्वाची तत्त्वे आहेत. याचा दैनंदिन जीवनात वापर व्हावा. मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा विकास झाल्यास ‘मुले ऐकत नाहीत’ ही तक्रार यापुढे ऐकू येणार नाही.”
डॉ. भाऊसाहेब कारेकर म्हणाले: “विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवड, प्रयत्न आणि संधी महत्त्वाच्या आहेत. तसेच जागृत पालकत्व हे सध्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.”
डॉ. आर. एम. चिटणीस म्हणाले: “विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम, बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र, आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत आणि नैतिकदृष्ट्या चारित्र्यसंपन्न व शिस्तप्रिय असावा. यशस्वी व्यक्तिमत्त्वासाठी मी रोज व्यायाम करेन, नवीन गोष्टींचे आकलन करेन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेन. त्याचा अतिरेक घातक असतो.”
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. एस. एन. पठाण यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. “नैतिक मूल्ये मुलांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल होतो. उत्तम चारित्र्य हीच जीवनाची खरी संपत्ती आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी आणि काही पालकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. एकनाथ सारुक यांनी मानले.
राज्यस्तरीय विजेत्यांची नावे
पश्चिम महाराष्ट्र विभाग
प्रथम: अभय केंद्रे – सणस विद्यालय, पुणे
द्वितीय: सुप्रिया इंगळे – साधना इंग्लिश मिडियम स्कूल, हडपसर
तृतीय: तन्वी हळदे – मुक्ताई सुतार विद्यालय, कोथरुड
चतुर्थ: ओंकार शेटे – महाराज सयाजीराव विद्यालय, सातारा
पाचवा: वेदिका पवार – ज्ञानगंगा विद्यालय, शिरूर
मराठवाडा विभाग
प्रथम: अक्षता बाचणे – चिन्मयानंद स्वामी विद्यालय, दारी बोरगाव
द्वितीय: निकिता सुरवसे – मुकुंदराव माध्यमिक विद्यालय, नांदगाव
तृतीय: निशत पठाण – श्री सरस्वती स्कूल, रामेश्वर
चतुर्थ: गीतांजली भोसले – डॉ. विश्वनाथ कराड स्कूल, लातूर
पाचवा: पूनम सूर्यवंशी – मुकुंदराव माध्यमिक विद्यालय, नांदगाव
विदर्भ विभाग
प्रथम: खुशी माहिंगे – जनता हायस्कूल, पूर्णानगर
द्वितीय: मयुरी मालोये – श्री शिवाजी हायस्कूल, आकोट
तृतीय: धनश्री शेळकर – श्री शिवाजी विद्यालय, कुटासा, अकोला
चतुर्थ: निधी दोडके – आदर्श विद्यालय, आंजी, वर्धा
पाचवा: श्रावणी काठे – जनता विद्यालय, पूर्णा























