पंढरपूर – पंतप्रधान आवास योजना कित्येक वर्षांपासून रखडली; लाभार्थ्यांचे पैसे अडकले, घरांचे स्वप्न अधांतरी असल्याने येथील माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पंढरपूर शहरातील पंतप्रधान आवास योजना गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडल्याचे समोर आले असून, अनेक लाभार्थ्यांचे कष्टाचे पैसे अडकून पडले आहेत. घर मिळण्याची प्रतीक्षा करताना नागरिकांना ना घरे मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या योजनेसाठी अनेकांनी व्याजाने पैसे काढून हप्ते भरले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही कोणतीही ठोस प्रगती न झाल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. हतबल झालेल्या नागरिकांनी अखेर भाजपचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक विक्रम शिरसठ यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा मांडली.
यावेळी विक्रम शिरसठ यांनी नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व बेघर नागरिकांना घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. मात्र पंढरपूरमध्ये स्थानिक नगरपालिका व ठेकेदार यांच्यातील दुमतामुळे योजना रखडली आहे. दहा वर्षे उलटूनही अनेकांना घरे मिळालेली नाहीत.”
पुढे ते म्हणाले की, “प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. पंढरपूरकरांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. तसेच, जर न्याय मिळाला नाही तर ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्या नागरिकांना बेकायदेशीर ताबा मिळवून देण्याचाही विचार केला जाईल. यानंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामांना नगरपालिका व संबंधित ठेकेदार जबाबदार असतील.”
दरम्यान, या प्रकरणामुळे पंढरपूरमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत असून, लवकरात लवकर योजना पूर्ण करून लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे.

























