पंढरपूर – वारकरी सांप्रदायातील महाराज मंडळीची यादी जाहीर करून त्यांना घूसखोर संबोधणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्याची मागणी येथील बैठकीत आज करण्यात आली.
पंढरपूरातील वारकरी संप्रदायातील सर्व फडकरी, मठाधिपती,दिंडीमालक, संस्थानिक, पंढरपूर मधील वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे स्थानिक नागरिक यांची एक संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत संतांचे वंशजयांसह संप्रदायातील समस्त वारकरी फडकरी समाज संघटना, वारकरी संप्रदाय पाईक संघ, विश्व वारकरी संघ,विश्व वारकरी सेना , अखिल वारकरी भाविक मंडळ इ.संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नुकतेच राष्ट्रवादी पक्ष (श.प.) गटप्रमुख शरद पवार यांनी केलेले वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असल्या विषयक वादग्रस्त लेखन,त्या पाठोपाठ पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी संप्रदायात पुज्यस्थानी असणाऱ्या मान्यवर महाराज मंडळींची नावे जाहीर केली होती. या घटनांमुळे वारकरी संप्रदायात अत्यंत संतापाची लाट उसळलेली आहे. संप्रदायाच्या सर्व स्तरातून तर निषेध होतोच आहे.मात्र संप्रदायावर अकृत्रिम प्रेम करणारा लाखोंचा सर्वसामान्य समाज वारकरी संप्रदायाला निष्कारण राजकिय पक्ष लक्ष्य करत असल्याचे पाहून क्रोधाविष्ट झाला आहे. ज्या वीस महाराज मंडळींची नावे घुसखोर म्हणून जाहिर केली आहेत.ते लोक म्हणजे ज्यांनी ज्ञानोबा तुकोबारायादी संतांच्या पश्चात हा वारकरी संप्रदाय जतन आणि संवर्धित केला अशा शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या दिव्य परांपरांचे जेष्ठ अधिकारी मंडळी आहेत. यात प्रामुख्याने बंडा तात्या कराडकर हे संप्रदायातील जेष्ठ वारकरी ज्यांनी वारकरी म्हणून सर्वोच्च सेवेचा मापदंड तर केलाच आहे.पण जगद्गुरु तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगर वाचवण्यासाठी ‘डाऊ’ सारखी विषारी वायू उत्पन्न करणारी कंपनी जाळून लाखो जणांचे प्राणच जणू वाचवले होते. देगलूरकर घराण्याने चातुर्मासात पंढरपूरची सिमारेषा ओलांढायची नाही यासाठी आपल्या तत्कालीन वतनांवर पाणी सोडलेले आहे स्वतः चंद्रशेखर महाराज हे आपल्या प्रकांड विद्वत्तेने सकल वारकऱ्यांच्या ह्रदयस्थानी विराजमान आहेत. वासकर महाराज हे त्या परंपरेचे गादीप्रमुख आहेत ज्या ब्रह्मलीन मल्लाप्पा वासकरांनी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली, पाचपोर महाराज यांचे गोरक्षणाचे कार्य अद्वितीय आहे अशा प्रत्येकच महाराज मंडळींच्या कार्याचा आवाका मोठा आहे. यात अक्षय महाराज भोसले व आचार्य तुषार भोसले यांनी अनुक्रमे शिवसेना व भाजप या पक्षाचे आध्यात्मिक आघाडी असे व्यासपीठ निर्माण करुन त्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत या प्रयत्नांतूनच पंढरपूरसाठी मुख्यमंत्री यांनी एक हजार बेडचे रुग्णालय मंजूर केले आहे. तरीही या आघाडीच्या माध्यमातून कोणीही महाराज मंडळी राजकारणात उतरली नाहीत किंवा संप्रदाय कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही हे निर्विवाद सत्य आहे.
झालेल्या या प्रकारामुळे सर्व सामान्य वारकऱ्यांची अत्यंत संतापाची भुमिका असल्याचे लक्षात घेऊन आजची बैठक घेण्यात आली व यात लवांडे यांनी तात्काळ वारकरी संप्रदायाची माफी मागावी, ज्या पुजनीय संतांना घुसखोर म्हणून अवमानीत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून क्षमायाचना करावी. हे स्वतः लवांडे करत नसल्यास उद्या दुपारी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन लवांडेच्या अटकेची मागणी केली जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या तीव्र भावना व कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होऊ शकणारा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन लवांडेना अटक करावी. अन्यथा येत्या आठवड्यात पंढरपूर मध्ये एक भव्य दिव्य दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात येईल, गावोगावी अशा तक्रारी मोर्चे होतील, मानहानीचा दावा दाखल होईल. वारकरी संप्रदायाचा विनाकारण दुस्वास करणारांना कायमचा धडा शिकवण्याचा विडा संप्रदायाने उचलला असून शासनाने महाराष्ट्र सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व राष्ट्रवादी पक्ष (श.प.) गटाने आपली आणखी वाताहत होऊ नये यासाठी तात्काळ लवांडेवर कारवाई करावी अन्यथा वारकरी संप्रदायाच्या अद्भूत,अकल्पनीय, अविश्वसनीय रोषाला सामोरे जावे लागेल असा देखील यावेळी इशारा देण्यात आला
या बैठकीत खालील महाराज मंडळी प्रातिनिधिक स्वरुपात उपस्थित होती.
सर्वश्री ह.भ.प.संजय महाराज देहूकर
डाॅ.महेश महाराज देहूकर (जगद्गुरु तुकाराम महाराज वंशज )विठ्ठल महाराज नामदास ,निवृत्ती महाराज नामदास(संत नामदेव महाराज वंशज)
भागवत महाराज शिरवळकर ,विठ्ठल स्वामी महाराज वडगांवकर, भागवत महाराज चवरे, विठ्ठल महाराज चवरे,रघुनाथ महाराज कबीर
नागेश महाराज बागडे ,रामकृष्ण महाराज वीर
शाम महाराज उखळीकर ,विश्वनाथ महाराज राशीनकर ,हरि महाराज लबडे ,श्रीकांत महाराज हरिदास ह्रषीकेश महाराज उत्पात ,रमेश महाराज वाघ, आळंदी , ज्ञानेश्वर महाराज तारे ,योगेश महाराज पिंपळनेरकर ,पद्मनाभ महाराज देवडीकर ,माधव महाराज बडवे , नगरसेवक सौरभ थिटे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
चौकट: राजकारणी लोकांना आम्ही राजकारण कसे करावे हा सल्ला देत नाही त्यांनी आम्हाला संप्रदाय कसा चालवायचा शिकवू नये. संप्रदाय हिंदू धर्मातील एक सर्वात विकसीत उपासना पंथ आहे. संप्रदायाला निधर्मी ठरवण्याचा प्रयत्न कशाला ? संप्रदायामुळे जातीयभिंती नष्ट होऊन समाज धर्ममार्गाने एकत्र येतो तेव्हा जातीयवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना याचा मोठा अडसर निर्माण होतो हिच यांची पोटदुखी. मोठ्या पक्षांशी लढण्याची ताकद नाही म्हणून वारकरी संप्रदायाला लक्ष्य केले जात असल्याचे देखील यावेळी महाराज मंडळींकडून सांगण्यात आले.

























