बीडमध्ये मनोज जरांगे यांची सभा गुरुवारी पार पडली. या सभेत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करच जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस हे माझी बदनामी करत आहेत असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की मला गुप्त माहिती मिळाली आहे की देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आहे. मुंबईला जसा मोर्चा काढला होता त्यावेळी तेरा ट्रॅप रचले गेले होते. आता या आठवड्यातही असंच काही सुरु आहे. बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं, केसेस करायच्या, सामान्य मराठा पोरांवर केसेस करायच्या हे चाललं आहे. ऐकलं नाही तर एसआयटी नेमा आणि तुरुंगात टाका हे चाललं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मागच्या २० ते २२ दिवसांपासून मराठा समाज वेठीला धरला आहे. काहीही कारण नसताना त्रास देणं सुरु आहे. मात्र बाबा तुला माहीत नाही, देवेंद्र फडणवीस मला अटक करायला हिंमत लागते. सहा कोटी मराठ्यांना ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे. राज्यात आम्हाला घरं आहेत तशी तुमचीही घरं आहेत हे विसरु नका असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन. मला कितीही बदनाम करा, समाजापासून एक इंचही मागे हटणार नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. मी मेलो तरीही तुमच्या बाजूने येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांची वृत्ती नीच आहे. आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढतोय याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्ही खरे राजकारणी. मात्र फडणवीस हे बेगडी राजकारणी आहेत. मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो आहे. तुम्ही मला बदनाम करा, कट रचा मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही. माझ्याविरोधातले व्हिडीओ व्हायरल केले तर याचा सुपडा साफ करायचा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही. त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी SIT चौकशी सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊद्या. मी सागर बंगल्यावर जाऊन दहा लाख घेऊन जातो. मराठ्यांनी व्यसनापासून लांब रहा, आपली प्रगती कोणीही रोकू शकत नाही. जामनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा प्यायला आणि पोहे खाल्ले, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.