आजवर राजकारणात नसलो तरी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. यापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ती वेळ आली असेल, असे वक्तव्य छत्रपती शाहू महाराज यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांना गुरुवारी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी आज, शुक्रवारी कोल्हापूर येथे संवाद साधताना सांगितले.
वर्षभरापूर्वी शाहू यांनी राजकारणात उतरायचे नाही असे म्हंटले होते. त्यापार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, मी स्वत:ला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण वर्षभरापूर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा माझा निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शाहू यांनी सांगितले. महाराष्ट्रला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. याशिवाय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेण्याचे काम मी करणार आहे. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी शाहू महाराज यांनी म्हटले. तसेच सध्याच्या काळात पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज शाहू महाराजांनी व्यक्त केली. पुरोगामी घटक एकट्याने लढले तर यशस्वी होणे कठीण आहे. त्यामुळे सर्व पुरोगामी पक्ष आणि घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे शाहू यांनी सांगितले.