देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते.
महान भारत देश महानतेच्या आणि वैभवाच्या शिखरावर जावो – अडवाणी
फेब्रुवारीमध्ये अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा झाली, तेव्हा त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. आता पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अडवाणी म्हणाले की, ‘आज मला मिळालेला भारतरत्न मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा करण्याचा प्रयत्न केलेल्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, विशेषत: माझ्या प्रिय दिवंगत पत्नी कमला यांच्याबद्दल माझ्या मनापासून भावना व्यक्त करतो. त्या माझ्या जीवनातील शक्ती आणि स्थिरतेचा सर्वात मोठा स्त्रोत राहिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार आहेत. आपला महान भारत देश महानतेच्या आणि वैभवाच्या शिखरावर जावो.’
राष्ट्रपतींनी शनिवारी राष्ट्रपती भवनात चार व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. दरम्यान अडवाणी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आज प्रदान करण्यात आला.