जालना – शहरातील लक्कडकोट परिसरातील श्रीजीत ट्रेडर्स दुकानावर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, मारहाण, तोडफोड आणि तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग १४ दिवस उपोषण करून न्यायासाठी लढा देणाऱ्या सौ. जयश्री संजय कटके यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन हलले असून, संबंधितांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास लक्कडकोट येथील न.भू.क्र. १०५७३ वरील श्रीजीत ट्रेडर्स या दुकानावर १० ते १२ इसम आणि ८ ते १० महिलांनी एकत्र येत जबरदस्तीने गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील साहित्याची तोडफोड करत मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले. यावेळी संबंधितांनी लोखंडी सळईसारखी हत्यारे हातात घेऊन धमक्या देत दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या फिर्यादीत सौ. जयश्री कटके यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता संबंधितांनी आम्हाला ही जागा आम्ही सुपारी घेऊन ताब्यात घेत आहोत असे सांगितले. तसेच ५० लाख रुपये द्या, नाहीतर जागा सोडा अशी उघडपणे खंडणी मागण्यात आली. आम्हाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली.
या घटनेत दुकानातील फ्रीजचे हॅण्डल तोडणे, ग्रेनाईट-मार्बल साहित्याची नासधूस करणे, महत्त्वाचे कागदपत्रे व बिलबुक काढून नेणे, तसेच दुकानातील इतर साहित्याचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या सर्व प्रकारात अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, प्रणय अनिल राठी, गोविंद राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी, आदित्य मालपाणी, सुरेश मालपाणी यांच्यासह इतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महेंद्र रत्नपारखे, विजय पवार, किशोर जाधव, आकाश जाधव, वनमाला शर्मा यांच्यासह इतर अज्ञात व्यक्तींचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या घटनेपूर्वीही सौ. कटके यांनी दि. १९ मार्च, ३० मार्च, ८ एप्रिल, १० एप्रिल आणि २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज सादर केले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी दि. १४ एप्रिलपासून अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. अखेर १४ दिवसांच्या संघर्षानंतर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अंतर्गत जबरदस्तीने ताबा घेणे, मारहाण, धमक्या देणे, खंडणी मागणे, मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जर एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी १३ दिवस उपोषण करावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा गुन्हेगार प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता या प्रकरणात दोषींवर कितपत कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषण स्थळी डॉ. वैभव ढाकणे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे बाबा हरणे, सोमनाथ उबाळे, राजमाने यांनी सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपोषण सोडले आणि पुढील उपचारासाठी दीपक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.


























