कुरूल – आई म्हणजे मायेचा अथांग सागर, आयुष्यभर सावली देणारे प्रेम आणि प्रत्येक संकटात आधार देणारी शक्ती. अशा आईच्या निधनानंतर तिच्या आठवणी कायमस्वरूपी जिवंत राहाव्यात, यासाठी कुरुल येथील धनाजी चंदनशिवे यांनी अत्यंत भावनिक आणि समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम राबविला. आईच्या रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांनी वृक्षारोपण करून “आईची आठवण कायम माझ्यासोबत राहावी” असा संदेश दिला.
परंपरेनुसार रक्षा विसर्जन करताना अनेकजण धार्मिक विधी करतात; मात्र पर्यावरण संवर्धनाची जोड देत धनाजी चंदनशिवे यांनी वृक्षाचे रोप लावून त्या वृक्षामध्ये आईच्या स्मृती जपण्याचा संकल्प केला. “आई जशी आयुष्यभर आपल्याला आधार देत असते, तसाच हा वृक्ष पुढील अनेक वर्षे सावली, प्राणवायू आणि जीवन देईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनीही या उपक्रमाचे कौतुक करत “रक्षा विसर्जनासारख्या धार्मिक विधींमध्ये वृक्षारोपणाची जोड दिल्यास पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल,” असे मत व्यक्त केले.
सध्या पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत दुःखाच्या प्रसंगातही समाजाला सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आईच्या स्मृतींना भावनिक आदरांजली अर्पण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या धनाजी चंदनशिवे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. |
