सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाचा निधी वाढवण्याची जोरदार मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सध्या कृषी विभागाकडे केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो अत्यंत अपुरा असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा निधी वाढवून किमान सात कोटी रुपये मंजूर करावेत, असा आग्रह सभागृहात धरण्यात आला.
खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांना बियाणे, खत, सिंचन, पीक संरक्षण आणि शेतीपूरक योजनांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मात्र निधीअभावी अनेक योजना अर्धवट राहात असून लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळत नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. कृषी विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर मर्यादा येत असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला.
कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी यावेळी कृषीप्रधान देशातच कृषी विभाग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याची खंत व्यक्त केली. मात्र आता जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्याने शेतकऱ्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. निधीवाढीसाठी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर निधी वाढ अपरिहार्य असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून कृषी विभागासाठी वाढीव निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभेत दिले.
चौकट
पशुसंवर्धन विभागातील भरती प्रक्रिया लवकरच
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील विविध प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा त्वरित भरणे आवश्यक असल्याचे या सभेत नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने लवकरच यावर कार्यवाही केली जाईल. संबंधित शिक्षण पात्रता असलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया जाईल, असे संकेत ही सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी दिले.
Post Views: 10