अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अधिक मासानिमित्त परगावच्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः श्री स्वामी समर्थ मंदिर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर भक्तांनी फुलून गेला आहे . दररोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. शनिवार रविवार रोजी १ लाखा पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला .
हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. देवदर्शन, जप-तप, दानधर्म आणि अन्नदान यांना अधिक मासात विशेष पुण्य मानले जाते. याच पार्श्वभूमीवर देशभरातील स्वामीभक्त अक्कलकोट येथे दाखल होत आहेत. गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, सातारा, सांगली आदी भागांसह देशाच्या विविध राज्यांतून भाविक अक्कलकोटमध्ये येत आहेत.
दर्शनासाठी आलेले हजारो भाविक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेत असून गुरुवार, शनिवार व रविवार या दिवशी तब्बल ३५ ते ४० हजार भाविक दोन वेळा महाप्रसाद घेत असल्याची माहिती मिळाली. श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत भाविक समाधान व्यक्त करत आहेत.
दरम्यान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील महाप्रसादगृहाचे रूपांतर आता भव्य आणि देखण्या दरबार हॉलमध्ये झाले आहे. हॉलमधील आकर्षक झुंबरे, नक्षीदार सीलिंग आणि प्रकाशयोजना भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
याशिवाय मान्यवर अतिथींसाठी स्वतंत्र आश्रयदाते कक्ष, व्हीव्हीआयपी सूट, महाप्रसाद कक्ष तसेच लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परिसरात डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
महाप्रसादगृहासमोर कपीला गाय, भव्य दीपमाला, श्री स्वामी समर्थांची २५ फूट उंच मूर्ती, “वारुळातून प्रकटले स्वामी” मूर्ती, मार्गदर्शक एलईडी बोर्ड अशी आकर्षक निर्मिती करण्यात आली आहे. गणेश मंदिरालगत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फूट उंच अश्वारूढ पुतळा, त्याभोवती उभारलेली गड-किल्ल्यांची शिवसृष्टी आणि सुंदर बालउद्यान भाविक व स्थानिक नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
परगावच्या भाविकांसाठी महाप्रसादासह निवासाचीही उत्तम व्यवस्था अन्नछत्र मंडळात करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, सचिव शामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त मंडळ, कर्मचारी व सेवेकरी वर्ग भाविकांच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहेत.
अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात भक्तिभाव, सेवा आणि अन्नदानाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून स्वामीभक्तांची मांदियाळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Post Views: 27