
रत्नागिरी – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर, मुंबई (शिवाजी पार्क) येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे. ही ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त होण्यापासून वाचवण्यासाठी व तिचे ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून जतन करण्यासाठी आज हिंदु जनजागृती समिती व समविचारी संघटना यांच्या वतीने येथील जयस्तंभ येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात श्री. राजेश आयरे (अध्यक्ष, शिक्षक परिषद रत्नागिरी), श्री. नीलेश आखाडे (रत्नागिरी शहर सरचिटणीस, भाजप), श्री. संदीप नाचणकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, दक्षिण रत्नागिरी), श्री. संजय जोशी (महाराष्ट्र संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ), श्री अनंत आगाशे (अध्यक्ष, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा), श्री. शैलेश बेर्डे (रत्नागिरी शहर उपाध्यक्ष, भाजप), श्री. गणेश गायकवाड (जिल्हाध्यक्ष, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी), अधिवक्ता श्री सचिन रेमणे (विश्व हिंदु परिषद, धर्मप्रसार विभागप्रमुख), श्री. समीर करमरकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), सौ. शुभांगी मुळ्ये (सनातन संस्था) यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी संघटना आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी नागरिकांनी सावरकरांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आणि ‘सावरकर सदन वाचवा’ अशा घोषणा दिल्या.
आंदोलनादरम्यान हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. गोविंद भारद्वाज म्हणाले की, जिन्ना हाऊसला संरक्षण, मग सावरकर सदनावर पडझड का? भारताच्या फाळणीला आणि लाखो हिंदूंच्या कत्तलीला कारणीभूत असणाऱ्या महंमद अली जिन्ना यांचे मुंबईतील ‘जिन्ना हाऊस’ स्वतंत्र भारतात सुरक्षित राहते; मात्र अखंड भारतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानाला पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याची वेळ येते, हे दुर्दैवी आहे.
केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर कोट्यवधी रुपये खर्चून ताब्यात घेतले, तसेच इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे. त्याच धर्तीवर स्वा. सावरकर तब्बल ४ दशके (वर्ष १९३८ ते १९६६) राहिले त्या ‘सावरकर सदना’चेही शासनाने त्वरित संपादन करावे.बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्ष २०१० मध्येच या वास्तूचा वारसा (Heritage) यादीत समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवली आहे; मात्र गेल्या १५ वर्षांत शासनाने यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. याच फायदा घेऊन बिल्डर लॉबी ही वास्तू बळकावण्याचा प्रयत्न करत आहे.
आंदोलकांद्वारे शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यामध्ये सरकारने ‘सावरकर सदन’ पुनर्विकासाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा आणि या वास्तूचे ‘राष्ट्रीय स्मारकात’ रूपांतर करावे. या वास्तूची मालकी सरकारने स्वतःकडे घेऊन तिथे सावरकरांच्या हस्तलिखितांचे, पत्रांचे भव्य संग्रहालय, संशोधन केंद्र आणि डिजिटल लायब्ररी विकसित करावी. विद्यमान महायुती सरकारने नेहमीच स्वा. सावरकरांच्या विचारांचा गौरव केला आहे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव, संसदेतील तैलचित्र, १०० रुपयांचे स्वा. सावरकरांचे स्मारक नाणे काढले आहे. त्यामुळे या वास्तूच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करून सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा याच सरकारकडून आहे.
जर शासनाने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सावरकरप्रेमी जनतेला सोबत घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शेवटी समितीच्या वतीने देण्यात आला.


















