सांगोला – राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. सांगोला तालुक्यातील सर्व ३४ मते राजेंद्र राऊत यांनाच मिळतील. शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असून एका मताचाही फरक पडणार नाही, असे मत माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले. ते सोलापूर येथील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये आयोजित शिवसेनेच्या जिल्ह्यातील नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व जि.प. सदस्य यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, स्थानिक निवडणुकांमध्ये काय झाले यापेक्षा भविष्यातील विकास महत्त्वाचा आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. विकासनिधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीसोबत उभी राहील. राजेंद्र राऊत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मनोगतात जिल्ह्यामध्ये महायुती माझ्या पाठीमागे असून माजी आ.शहाजीबापू पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे सारखी मातब्बर मंडळी सोबत असल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मिळेल हीच अपेक्षा आहे अशी भूमिका व्यक्त केली. बैठकीस खा.धैर्यशील माने, माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै.चंद्रहार पाटील, माजी आ.सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.