पंढरपूर – पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, प्रस्तावित विठ्ठल कॉरिडॉरमुळे भविष्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायमस्वरूपी अतिरिक्त पोलीस यंत्रणा उभारण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, तसेच विविध शाखांसह सुमारे १५ ते २० पोलीस अधिकारी आणि २३० कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.
पंढरपूर येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, विठ्ठल कॉरिडॉरच्या उभारणीनंतर भाविकांची संख्या वाढणार असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया सोबत वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला विशेष शाखा आदी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
——————
चौकट: (अतिक्रमणास विरोध केल्यास कारवाई )
पंढरपूर शहरातील अतिक्रमणामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईस कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा व्यक्तीने अडथळा आणल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी दिला.
—————-
चौकट: (यात्रा कालावधीत ५जी वॉकी-टॉकी यंत्रणा)
यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच ५जी वॉकी-टॉकी प्रणाली कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. यासाटी जिओ आणि एअरटेल कंपन्यांशी चर्चा सुरू असून, वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी आणि मुख्यमंत्री बंदोबस्त तसेच आपत्कालीन संदेशवहनासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पालखी मार्गासह पंढरपूर शहरात २० ते २५ ठिकाणी नेटवर्क टॉवर्स उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
——————
चौकट :(भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य)
आषाढी यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यात येणार असल्याचेही जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केले.
















