सोलापूर : आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी कोणतीही सीमा अशक्य नसते, याची प्रचिती सोलापूरच्या श्रेया जयकुमार माने हिने आपल्या कर्तृत्वातून दिली आहे. गुजरातमधील धोलावीरा येथे आका स्पेस संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेले लुनार अनलॉग मिशन यशस्वीपणे पूर्ण करून श्रेयाने नवोदित अवकाशयात्री म्हणून आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
चंद्रावरील वास्तव्यासारख्या वातावरणाची पृथ्वीवर निर्मिती करून भविष्यातील मानवी चंद्र मोहिमांसाठी आवश्यक प्रशिक्षण देणाऱ्या या अत्याधुनिक मोहिमेत श्रेयाने क्र्यु सायकॉलॉजिस्ट ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मोहिमेदरम्यान तिने सहकारी सदस्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यमापन, तणाव व्यवस्थापन, संघभावना वृद्धिंगत करणे, नेतृत्व विकास आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक मानसशास्त्रीय मार्गदर्शन केले.
ही मोहीम पृथ्वीवरील प्रतिकूल, एकाकी आणि मर्यादित संसाधनांच्या परिस्थितीत चंद्रावरील वास्तव्यासारखा अनुभव देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत सहभागी सदस्यांनी EVA (Extravehicular Activity) Simulation, हॅबिटॅट ऑपरेशन्स, वैज्ञानिक संशोधन, मिशन नियोजन, संसाधन व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रशिक्षणामुळे सहभागींच्या तांत्रिक, वैज्ञानिक, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि संघभावना या गुणांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्यांना अधिक सक्षम बनविण्यात ही मोहीम महत्त्वाची ठरली.
या मोहिमेचे नेतृत्व मिशन कमांडर कीर्ती विप्पर्थी यांनी केले. गीतांजली राजपूत यांनी एव्हिए लीड , श्रेया जयकुमार माने यांनी क्र्यू सायकॉलॉजिस्ट, तर प्रियांदर्शिनी अय्यनार हिने मेडिकल ऑफिसर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
श्रेया जयकुमार माने ही माजी आ. ब्रह्मदेव माने यांची नात तर सोलापूर मनपाचे नगरसेवक जयकुमार माने व प्रिया जयकुमार माने यांची कन्या असून, माजी आमदार दिलीप माने यांची पुतणी आहे. अवकाश संशोधनासारख्या अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रात तिने मिळविलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सोलापूरकरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिची ही कामगिरी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेयाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, भविष्यात भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये तिचे योगदान निश्चितच मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



















