धाराशिव : विकासकामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहेत, निधीही उपलब्ध झाला आहे आणि कामांना सुरुवातही झालेली आहे. आता कोणतीही कारणे सांगून ती रखडणार नाहीत याची काळजी घ्या. निर्धारित वेळेत सगळी कामे पूर्ण करा. अडचणी येत असतील तर त्यावर उपाय शोधा, कायदेशीर अडथळे असतील तर पर्यायी मार्ग काढा आणि प्रत्येक काम निश्चित वेळेत पूर्ण करा, अशा स्पष्ट आणि कडक शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना बार्शी-बोरफळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान निर्देश दिले आहेत.
बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, प्रगती आणि येणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहरातील कामाची गती वाढविण्याचेही निर्देश दिले आहे. केवळ काम पूर्ण होण्याची अंदाजे मुदत सांगून चालणार नाही. पुढील प्रत्येक १५ दिवसांत कोणते काम पूर्ण होणार, याचा ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच केवळ कागदोपत्री प्रगतीऐवजी प्रत्यक्ष कामाच्या वेगावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या आहेत.
रस्त्याच्या हद्दीतील वीजवाहिन्यांचे खांब आणि डीपी हे कामातील प्रमुख अडथळे असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अडथळे तातडीने दूर करून संबंधित यंत्रणांनी खांब व डीपी स्थलांतरित करण्याची कार्यवाही त्वरीत पूर्ण करावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. काही ठिकाणी कायदेशीर बाबींमुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याचेही यावेळी समोर आले. मात्र, अशा कारणांमुळे विकासकामे थांबविणे योग्य नसल्याचे सांगत, जिथे अडचणी आहेत तेथे पर्यायी आणि व्यवहार्य उपाय शोधून कामे पुढे नेण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत. यावेळी नगराध्यक्षा नेहाताई काकडे, सतीश दंडनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत, मुख्याधिकारी नीता अंधारे, नगरसेवक अभिजित काकडे, अभिजित पतंगे, पृथ्वीराज दंडनाईक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
१४० कोटींच्या १४ विकासकामांकाही आढावा;
धाराशिव शहरातील सुमारे १४० कोटी रुपयांच्या १४ विकासकामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक कामाची सद्यस्थिती, प्रगती, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तसेच काम पूर्ण होण्याचा कालावधी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून यावेळी माहिती घेण्यात आली. प्रत्येक विकासकामासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करून संभाव्य अडथळे तातडीने दूर करावेत आणि कामांना गती द्यावी, असे आदेश यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या पैशातून उभारली जाणारी कोट्यवधी रुपयांची विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणी विकासकामे सुरू आहेत, त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी समिती स्थापन करून कामावर नियमित लक्ष ठेवावे आणि काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.






















