पंढरपूर – आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १४ जुलै २०२६ पर्यंत शहरात धडक तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत २१७ आस्थापनांची तपासणी करून १७२ नमुने घेतले असून ३ आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा २१७ आस्थापनांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे १७२ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
( तीन आस्थापनांवर कारवाई)
निकृष्ट दर्जा व स्वच्छतेच्या अभावामुळे खालील ३ आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले :
१. मे. मंगलमुर्ती मिसळ व भेळ, तीन रस्ता, शेगांव दुमाला, ता. पंढरपूर २. मे. हॉटेल स्वरा ॲण्ड चायनिज सेंटर, शेगांव दुमाला, ता. पंढरपूर आणि ३. मे. हॉटेल श्री विष्णू सहस्त्रनाम, शेगांव दुमाला, ता. पंढरपूर
—————-
( वारी काळात विशेष दक्षता)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून लाखो वारकरी दाखल होत असतात. भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थ साठवणूक, स्वच्छता, वापरले जाणारे तेल, रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली.
सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की, नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता, गुणवत्ता व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आषाढीवारी २०२६ साठी प्रशासनाचे २० पथके कार्यरत आहेत. वारी कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
Post Views: 8