सोलापूर – इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली असून, शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. विशेषतः विज्ञान शाखेच्या कट ऑफने ऐंशी टक्क्यांचा टप्पा पार केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.
वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित विभागासाठी ८२.२० टक्के गुणांवर प्रवेश बंद झाले असून विनाअनुदानित विभागासाठी ७४ टक्के कट ऑफ लागला आहे. कला शाखेसाठी येथे ३५.२० टक्के गुणांवर प्रवेश क्लोज झाले आहेत.
दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेचा कट ऑफ ८१.८० टक्क्यांवर गेला असून कला शाखा ६०.४० टक्क्यांवर बंद झाली आहे. मुलींसाठी स्वतंत्र कट ऑफ अधिक राहिला असून विज्ञान शाखेसाठी ८५.२० टक्के तर कला शाखेसाठी ६६.८० टक्क्यांवर प्रवेश बंद झाले आहेत.
संगमेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखा ८० टक्क्यांवर बंद झाली असून कन्नड भाषिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के कट ऑफ राहिला आहे. वाणिज्य शाखेसाठी ६० टक्के तर कन्नड भाषिक विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुणांवर प्रवेश क्लोज झाले. कला शाखेसाठी येथे थेट प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे ४३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
पहिल्या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नाही, त्यांनी ऑनलाइन नकार नोंदवणे आवश्यक राहणार आहे.
पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांची माहिती महाविद्यालयांकडून प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रमात बदल करण्याची संधी मिळणार आहे.
चौकट……
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी ५ जूननंतर जाहीर होणार असून त्यानंतर उर्वरित तीन फेऱ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १ जुलै किंवा १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.
Post Views: 8