सोलापूर – जिल्ह्यात २०,००० पेक्षा जास्त महिला शासनाच्या चुकीच्या तांत्रिक धोरणामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या महिला आधीच ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘श्रावणबाळ योजना’ किंवा समाज कल्याण विभागाच्या इतर पेन्शन योजनांचा लाभ घेत होत्या, त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यावर त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शासकीय नियमांनुसार इतर पेन्शन घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर या महिलांची जुनी हक्काची पेन्शन बंद झाली आणि तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना ‘लाडकी बहीण योजना’ चे देखील पैसे मिळणे बंद झाले आहे. यामुळे अभिनव सामाजिक संस्था, सोलापूर’ अध्यक्ष मीनल दास यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘NOC’ मिळण्याची तांत्रिक अडचण दूर होत नाही, तोपर्यंत महिलांकडून ऑफलाईन हमीपत्र लिहून घेऊन त्यांची जुनी पेन्शन तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.

सध्या या महिला दोन्ही बाजूने शासकीय मदतीपासून वंचित राहिल्या असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जेव्हा या गरीब महिला आपली जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी समाज कल्याण केंद्र किंवा तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत, तेव्हा प्रशासनाकडून ‘लाडकी बहीण योजना बंद असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)’ मागितले जात आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, समाज कल्याण केंद्रात गेल्यावर अधिकारी वर्ग “वरच्या पातळीवरून किंवा सर्व्हरवरूनच NOC जनरेट होत नाही” असे सांगून महिलांना माघारी पाठवत आहेत.
प्रशासकीय स्तरावरील या तांत्रिक घोळामुळे सोलापूर जिल्ह्यातील 2० हजारांहून अधिक महिलांचे जगणे असह्य झाले आहे. तसेच लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरु होणार असे आश्वासन दिले परंतु ईकेवायसी सुरू केलेली नाहीये. ईकेवायसी नसणाऱ्या परंतु पात्र असणाऱ्या महिलांची संख्या सोलापूर जिल्ह्यात साधारणता एक लाखापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रात तर लाखोच्या वर आहे त्यामुळे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी गरिबांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत आणि त्यांना भीक मागून खाण्याची वेळ येऊ लागली आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तांत्रिक त्रुटींमुळे महिलांचे जेवढ्या महिन्यांचे मानधन/पेन्शन थकीत आहे, ते सर्व पैसे त्यांना व्याजासह किंवा विशेष भत्ता म्हणून तात्काळ अदा करण्यात यावा.
या प्रसंगी अनिता वाघमारे, जयश्री रानसरजे, अरुणा जाधव, सुरेखा लंगरे, शारदा माने, मंगल दीक्षित, पार्वती मंडाल, कलावती कायदाल आदी उपस्थित होते.























