अक्कलकोट – पावसाळ्याच्या चाहुलीसोबत पर्यटनस्थळांच्या परिसरात, महामार्गावर जांभळांची विक्री जोमाने सुरू झाली आहै शहरवासीयांसह पर्यटकांकडून या हंगामी फळाला मोठी पसंती मिळत आहे. रस्त्यांच्या कडेला, पर्यटनस्थळांच्या प्रवेशद्वारांवर तसेच स्थानिक बाजारांमध्ये जांभूळ विक्रेत्यांची लगबग वाढली आहे.
नैसर्गिक चव, आकर्षक रंग आणि आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे जांभूळ हे फळ ग्राहकांच्या पसंतीचे ठरत आहे. विशेषतः मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जांभळाच्या बिया व फळांबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता वाढल्याने मागणीही वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व वनक्षेत्रातून जांभूळ गोळा करणाऱ्या कुटुंबांना चांगला रोजगार मिळत आहे.
सुट्टीच्या दिवसांत पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने जांभूळ विक्रीत आणखी भर पडत आहे. पर्यटक जांभळांचा आस्वाद घेण्याबरोबरच घरी नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. अवकाळी व मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने यंदाच्या वर्षी दर्जेदार आणि रसाळ जांभूळ उपलब्ध झाल्याने विक्रीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जांभूळ काढण्यासाठी विक्रेत्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. उंच झाडांवर चढून काळजीपूर्वक फळे गोळा करावी लागतात. तरीही ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हंगामी फळांमध्ये जांभूळ हे आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून ओळखले जात असल्याने आगामी काही आठवडे बाजारपेठेत जांभूळ विक्रीचा हंगाम अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या आठवडा बाजारसह भाजी मंडईत शेतकरी आणि व्यापारी वर्ग जांभूळ विक्री करीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
कोट–
जांभळाची गोड-तुरट चव आणि आरोग्यदायी गुणधर्म यामुळे शहरवासीयांसह पर्यटकांकडून मोठी मागणी आहे. स्थानिक विक्रेत्यांसाठी हा हंगाम आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
तसेच निसर्गाने दिलेल्या जांभळाच्या प्रत्येक दाण्यात चव, आरोग्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संधी दडलेली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही जांभूळ विक्री जोमाने सुरू असून त्याचा दर प्रति किलोला २५० ते १५० रुपये इतका आहे.
– अथर्व म्हेत्रे
शेतकरी
अक्कलकोट ते सोलापूर महामार्ग.
Post Views: 10