सोलापूर – जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी मार्डीचे सुपुत्र इंद्रजित पवार यांची झालेली निवड उत्तर सोलापूर तालुक्यासाठी नवी आशा निर्माण करणारी ठरली आहे. जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या उत्तर सोलापूरच्या विकासाला आता नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सोलापूर शहरालगत असलेल्या या तालुक्याची सामाजिक व आर्थिक नाळ शहराशी घट्ट जोडलेली आहे. अनेक राजकीय नेते व शेतकरी शहरात वास्तव्यास राहून गावची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागाचा संगम असलेला हा तालुका वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडून आलेल्या इंद्रजित पवार यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळणे, हा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. बीबी दारफळ गटातून निवडणूक लढवत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे यांचा पराभव केला.
या विजयाने त्यांची राजकीय ताकद अधोरेखित झाली. त्यांच्या मागे असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांचे मार्गदर्शन आणि राज्यातील नेतृत्वाशी असलेले सुसंवाद याचाही या यशात वाटा असल्याचे मानले जाते. उत्तर सोलापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषद मतदारसंघ असून, यापूर्वी केवळ दोन सदस्य निवडून येत असत. मात्र यंदा राजकीय समीकरणे बदलली असून भाजपने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशामुळेही भाजपला तालुक्यात बळकटी मिळाली आहे.
इंद्रजित पवार यांच्या उपाध्यक्षपदामुळे तालुक्याची प्रतिष्ठा उंचावली असून, विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, तसेच सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांवर भर देत तालुक्याला नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, अशी भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. एकंदरीत पवार यांच्या निवडीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यात विकासाची नवी पहाट उगवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.





















