सोलापूर – शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता केवळ भात-डाळीपुरते मर्यादित न राहता कडधान्ये आणि विविध पौष्टिक पदार्थांची भर पडणार आहे. ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात नवीन पंधरवडा पाककृती तक्ता लागू करण्यात आला असून, विशेषतः दर गुरुवारी विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत पूरक पोषण आहार दिला जाणार आहे. या बदलामुळे जिल्ह्यातील ४ लाख ५७ हजार ५४९ विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ऑगस्टपासून नव्या मेनूची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, ‘पीएम पोषण’ योजनेचे अधीक्षक तसेच महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
नवीन पाककृतीमध्ये मूगडाळ, मटकी, चवळी आणि वाटाणा यांसारख्या कडधान्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी २० ग्रॅम, तर उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ३० ग्रॅम या प्रमाणात कडधान्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारातील पोषणमूल्य वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
आठवड्याच्या मेनूमध्ये व्हेजिटेबल पुलाव किंवा मसालेभात, वरण-भात, मूगडाळ खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ आणि चवळी खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी सुट्टी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी पूरक आहार देण्यात येणार आहे. सुमारे ४ हजार ९६ शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत हा बदल पोहोचणार असल्याने नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेत आणि विविधतेत लक्षणीय बदल होण्याची अपेक्षा आहे.
चौकट
‘अतिरिक्त अनुदान’ नाही
नव्या पूरक आहारासाठी स्वतंत्र अतिरिक्त अनुदान दिले जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उपलब्ध यंत्रणा आणि नियोजित तरतुदीतूनच या मेनूची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या पाककृतीची अंमलबजावणी करताना पुरवठा आणि उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे.
चौकट
उपस्थितीवरच स्वयंपाकाचे गणित
शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच पोषण आहार शिजवावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अन्नाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तालुक्यांकडून आलेल्या मागणीनुसार तांदूळ व आवश्यक साहित्याचा वेळेत पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांनाही देण्यात आले आहेत.
कोट
नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी करावी
विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहारातून आवश्यक पोषणमूल्य मिळावे, यासाठी नवीन पाककृतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसारच आहार शिजवावा आणि अन्नाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कडधान्ये व अन्य साहित्याचा पुरवठा वेळेत होऊन नव्या मेनूची काटेकोर अंमलबजावणी करावी.
— कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर