बार्शी – शहर व तालुक्यात बुधवार दि. १३ मे रोजी दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास सुरु असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली तर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला.
दुपारी तीन वाजेपर्यंत बार्शी शहरात कडक उन्हासह जवळपास ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत होती. मात्र साडेतीनच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर बार्शी शहरासह खडकलगांव, बेलगांव, ताडसौंदणे, आगळगांव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
याच दरम्यान खडकलगांव येथील शेतकरी गणपती पट्टू कोळेकर यांच्या शेतात दुर्दैवी घटना घडली. गट क्रमांक १३४/२ मधील शेतात काम सुरु असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि शेतात बांधलेल्या बैलावर वीज कोसळली. या घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला.
सुदैवाने शेतकरी गणपती कोळेकर हे या दुर्घटनेत बचावले. मात्र शेतीचा खरा साथीदार आणि कष्टाने सांभाळलेला बैल डोळ्यांसमोर मृत झाल्याने कोळेकर कुटुंबीयांनी हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेत अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आधीच अवकाळी पाऊस, वाढते शेतीखर्च आणि आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेमुळे आणखी मोठा आघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीचा महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून पीडित शेतकरी गणपती पट्टू कोळेकर यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खडकलगांव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


























