बार्शी – बार्शी तालुका हा पूर्वी काँग्रेस विचारांचा तर सद्यस्थितीत भाजपविरोधी मतांचा आहे, असे मत अखिल भारतीय किसान काँग्रेसचे सहसंयोजक ऍड. जीवनदत्त आरगडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास AICC चे निरीक्षक देबासिस पटनायक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा निरीक्षक प्रा. यशराज पारखी, ॲड.भाऊसाहेब आजबे तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे, बार्शी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रणधीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी गाढवे, वरिष्ठ उपाध्यक्ष तानाजीराव जगदाळे, ओबीसी शहराध्यक्ष विजयसिंह ठाकूर, निलेश मांजरे पाटील, ईश्वर व्हनकळस यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ऍड. आरगडे म्हणाले, २००४ विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बार्शी विधानसभा मतदार संघात भाजप विचाराना अनुकूलता नाही. २०१४ मध्ये राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मोदी लाट असताना देखील बार्शीकर जनतेने मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसंत नाही. २०१४ च्या मोदी लाटेत सुद्धा बार्शी तालुक्यात काँग्रेसच्या विचारांचाच उमेदवार निवडून आला.
बार्शी तालुक्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वहीन आणि दिशाहीन झाल्याने सक्रिय असलेले दिसत नाहीत विद्यमान आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शीर्षस्थ नेतृत्वासह स्थानिक पदाधिकारी यांना सोबत घेऊन हायजॅक केल्याने वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक कार्यकर्ते देखील संभ्रमावस्थेत आहेत. अशातच आमदार सोपल यांच्या कार्यपद्धतीत विरोधकांना आव्हान देऊ शकतील अशी उमेद आढळून येत नाही. फक्त विरोधकांच्या नाराजीवर जनता राजी होईल अशा पडत्या फळाच्या अपेक्षेने आमदारांचे काम सुरु असल्याने आगामी काळात नव्या नेतृत्वाला जन्माला घालण्यासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक उपक्रम वाढविण्यावर भर द्यायला पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकात ही जागा काँग्रेस पक्षाला मागावी तसेच विधानसभेच्या जागा वाढणार असल्याने आता काँग्रेस पक्षासाठी आणखी अनुकूलता वाढणार आहे, असे मत अखिल भारतीय किसान काँग्रेस राष्ट्रीय समन्वयक तथा बार्शी शहर काँग्रेस कार्याध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘संघटन सृजन अभियान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
काँग्रेस पक्षाची संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम, सशक्त व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






















