गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अखेर घोषणा झाली आणि त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली असून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण ही दोन नावे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “अनुभवाला संधी की संघटन निष्ठेला पुरस्कार?” असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे ही निवडणूक वारंवार लांबणीवर पडली होती. मात्र यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर मतदारसंघाची आवश्यक रचना पूर्ण झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजपमध्ये सध्या अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी अंतिम फेरीत प्रशांत परिचारक आणि शशिकांत चव्हाण यांच्यातच खरी स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. प्रशांत परिचारक हे जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी “मी माझ्या कार्यकर्त्यांना कुणाच्याही दावणीला बांधणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे ते विधानसभा आखाड्यात उतरणार अशी चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्या वेळी पक्षाने त्यांना कोणते आश्वासन दिले होते, याबाबत अद्याप राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे. त्यामुळे विधान परिषद उमेदवारी हीच त्या तडजोडीचा भाग आहे का, यावर चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे शशिकांत चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करत संघटनात्मक पातळीवर स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीऐवजी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासून ठामपणे मांडली. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही त्यास समर्थन दिले. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. जिल्ह्यात कधीच पूर्णपणे सत्तेत नसलेला भाजप आज अनेक स्थानिक संस्थांमध्ये निर्णायक भूमिकेत आहे. त्यामुळे “यशस्वी संघटन नेतृत्वाला आता विधान परिषदेत संधी मिळणार का?” असा सवाल कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.
भाजपमध्ये अलीकडे काही नवे चेहरेही दाखल झाले असले तरी पक्ष एवढ्या महत्त्वाच्या निवडणुकीत नवख्या चेहऱ्यावर विश्वास दाखवेल का, याबाबत साशंकता आहे. कारण 2029 च्या राजकीय समीकरणांचाही विचार पक्षाला करावा लागणार आहे. अनुभवी नेतृत्व आणि निष्ठावंत संघटनकार्यातील संतुलन साधत भाजप कोणता निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पक्षाकडून गोपनीय सर्वेक्षण सुरू असल्याचीही चर्चा आहे. मतदारसंघातील स्थानिक संस्थांमधील राजकीय समीकरणे, मतदारांमधील स्वीकारार्हता, आगामी विधानसभा निवडणुकांवरील परिणाम आणि संघटनात्मक ताकद या सर्व बाबींचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. जिल्ह्यातील नव्या भाजप संघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ते कोणत्या नावाला पसंती देतात, यावरच उमेदवारीचे अंतिम चित्र ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप “राजकीय वजन” पाहणार की “संघटन निष्ठा” याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 6