पंढरपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती व प्राध्यापक प्रबोधिनी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून झाली. यावेळी अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बलवंत, उपप्राचार्य डॉ.राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. समाधान माने, उपप्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे, प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे प्रमुख डॉ. उमेश साळुंखे, कार्यालयीन प्रमुख चौरंगनाथ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील लोकशाही मूल्ये” या विषयावर डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, आंबेडकरांनी सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांना सर्वोच्च महत्त्व दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तसेच आंबेडकरांनी राज्य हे मानवकेंद्रित असावे, ते न्याय व कल्याणासाठी वापरले जावे, असा मूलभूत विचार मांडला.
डॉ. शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, काळाराम मंदिर सत्याग्रह व चवदार तळे सत्याग्रह या आंदोलनांतून सामाजिक समतेचा लढा अधिक बळकट झाला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्त्वांची प्रभावी मांडणी केली. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळासाहेब बलवंत यांनी आंबेडकरांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली गरज अधोरेखित केली. पश्चिम महाराष्ट्राला महात्मा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची समृद्ध विचारपरंपरा लाभली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















