पंढरपूर – घरातील किरकोळ कौटुंबिक वादातून तालुक्यातील गोपाळपूर येथील एक महिलेने चंद्रभागा नदीत आत्महत्या करण्यासाठी पात्रात उतरलेली होती. मात्र कोळी समाज बांधवानी ( जीवरक्षकांनी ) संबंधित महिलेचे प्राण वाचविले. ऐवढ्यावरच जीवरक्षक थांबले नाहीत तर त्यांनी ही माहिती येथील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, येथील चंद्रभागा नदी पुंडलिक मंदिर जवळ स्वप्नाली विवेक गुरव (रा.गोपाळपूर, ता.पंढरपूर) ही महिला घरामध्ये झालेला किरकोळ कौटुंबिक वादामुळे पाण्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उतरली होती अशी माहिती पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवणारे जीव रक्षक लीडर गणेश अंकुशराव यांनी दिली. यावेळी या जीवरक्षकांनी संबंधित महिलेचे प्राण वाचविले. त्या नंतर ही माहिती या जीवरक्षकांनी येथील पोलिसांना कळविली.
दरम्यान येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे व सोबत महिला फौजदार खडके यांनी चंद्रभागा नदीच्या ठिकाणी पोहचुन या महिलेस मन परिवर्तन करून त्या ठिकाणी महिलेला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले.
समुदेशानंतर संबंधित महिलेस पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती येथील शहर पोलिसांनी दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव, राजाभाऊ बळवंतराव, सुरज कांबळे, आप्पा कांबळे आदींसह कोळी समाजातील तरुण उपस्थित होते.




















