पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दि. ४ व ५ जुलै रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) उपस्थित होते. तसेच व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांच्या हस्ते सपत्नीक पूजा संपन्न झाली.
प्राणप्रतिष्ठेचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर श्री व्यंकटेश, श्री महालक्ष्मी, श्री काशी अन्नपूर्णा तसेच श्री मारुती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. या सर्व मंदिरांमध्ये पूर्वापार परंपरेनुसार नियमित नित्योपचार सुरू करण्यात आले आहेत. यावेळी विभाग प्रमुख भिमाशंकर सारवाडकर, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच पांडुरंग दशपुत्रे उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामांमुळे श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर यांचे मूळ वास्तुशिल्पीय आणि धार्मिक स्वरूप जतन करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे.
या संवर्धनामुळे मंदिरांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा अधिक भक्कम झाला असून भाविकांना अधिक पवित्र, सुरक्षित आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
Post Views: 9