सोलापूर : देवाच्या दरबारात विषमता दिसून येत नाही.राजा आणि सामान्य भक्ताला एकच न्याय असतो,तुकोबारायांच्या सांगतात , देवाच्या दर्शनाला येणारे भक्त पुण्यवानच असतील असे नाही. पापीसुद्धा येऊ शकतो. देवाला शरण आल्याबरोबर त्याचा स्विकार केला पाहिजे. असे भक्ताने देवाला बांधून घेतले आहे. त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी देवाची आहे. देवाला बांधून घेणारा भक्त पुंडलिक आहे. भगवान परमात्म्याचे सौंदर्य जगात कोणाचेही नाही.
अनंतवेळा जरी दर्शन घेतले तरी देवाचे सौंदर्य वेगळे दिसत नाही. देवाच्या चरणीच आमचे चित्त आणि दृष्टी असावी,असे तुकाराम महाराज सांगतात असे विचार श्री.वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर फड परंपरेचे विद्यमान वंशज ,वारकरी पाईक संघ ,पंढरपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर यांनी मांडले.
अधिकमासाच्या पर्वकाळात आयोजक ह. भ.प. माउली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य व मित्र परिवाराच्यावतीने दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात बुधवारपासून किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. बुधवारी रात्री आठ ते दहा या वेळेत श्री.वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर फड परंपरेचे विद्यमान वंशज ,वारकरी पाईक संघ ,पंढरपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर यांचे कीर्तन पार पडले.टाळ – मृदंगाचा गजर,आणि ज्ञानेश्वर माऊली तुकोबाच्या जयघोषाणे आसमंतदुमदुमून गेला होता.
मंगल आचरणाविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. अग्निदाहक असलेला तप्त ग्रह म्हणजे मंगल.आपल्यावरील येणारे संकट टळण्यासाठी मंगळ आचरण केले जाते. मंगल आचरण केले तरी कार्य निर्विघ्न पार पडेल याची शाश्वती देता येत नाही.
अंत: करणात विश्वास निर्माण होण्यासाठी मंगल आचरणाची गरज आहे.संकटच आले नाही तर आपण हाती घेतलेले कार्यच नाही.तुकोबाराय ज्या देवाचे वर्णन करतात त्याचे नाव घेण्याची गरज नाही. ब्रह्म पद आणि इंद्रपद नको म्हणणारे तुकोबाराय आहेत.
कर्म आणि धर्म दोन्ही नाशवंत आहे.कर्म आणि धर्म दोन्ही नको आहे,असे तुकोबाराय सांगतात .भक्ती करण्यासाठी अंत:करणाची स्थिरता महत्वाची असते. देवाच्या नामःचिंतनात सुख आणि समाधान आहे.अधिकमासाता ज्ञान आणि साधनेचे फळ मिळते.
तरुण मंडळी परमार्थाकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब आहे,असे गौवरोद्गारहि शिरवळकर महाराजांनी यावेळी बोलताना काढले.
संत मंडळींच्या हस्ते गड दर्शन सोसायटीमधील श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठुराय व रुक्मिणी मातेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून किर्तन महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी माउली महाराज बचुटे यांच्यासह वारकरी सांप्रदायामधील मान्यवर मंडळी उपस्थित होते.शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत हरी महाराज राशीनकर आणि रात्री ८ ते १० या वेळेत योगीराज महाराज गोसावी यांचे किर्तन होणार आहे.
Post Views: 41